भाजपचं ‘मुंबई मिशन’ ठरलं, शिवसेनेचं काय? आदित्य ठाकरे म्हणाले,

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौरा केल्यानंतर BMC निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. भाजपने १५० नगरसेवकांचं टार्गेट ठरवलेलं आहे आणि त्यानूसार भाजपची रणनीती सुरु आहे. भाजपचं मुंबई मिशन ठरलंय पण गेल्या २५ वर्षांपासून ज्या शिवसेनेचा भगवा BMC वर फडकतो आहे त्यांची रणनीती ठरली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एकनाथ शिंदेंचा बंड यामुळे शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे त्यामुळे यंदाची BMC निवडणुक प्रतिष्ठेची असणार आहे.
दरम्यान शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलंय. आदित्य म्हणाले, गेल्या 25 वर्षापासून मुंबईकरांची सेवा करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे. त्यामुळे कोणी कोणतेही मिशन ठरवले तरी मुंबईकरांचे आणि शिवसेनेचे नाते सर्वांना माहित आहे.या मिशनचा आणि गद्दारांचा कोणताही परिणाम मतदारांवर होणार नसल्याचा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केलाय.
मुंबई महापालिकेत राजकीय हस्तक्षेप वाढलेला असून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या रात्रीतून होत आहेत. केवळ पत्रव्यवहारावर सर्वकाही होत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम नेमके कसे करावे असा संभ्रम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या होत आहेत, त्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबईकर करीत आहेत. यामागे नेमका हेतू काय हे देखील मुंबईतील सुज्ञ नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे जनता मतदानातून हिशोब चुकता करणार हे निश्चित असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.