शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! पीएम किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय…

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले असून, लवकरच 12 वा हप्ता वर्ग केला जाणार आहे. अनेक अपात्र शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केले आहे. तसेच अपात्र शेतकऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल केली जात आहे.

पीएम किसान याेजनेत ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेली नाही. याबाबत अनेक शेतकरी गंभीर नसून, तांत्रिक अडचणींही येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च 2022 पासून ही आतापर्यंतची चौथी मुदतवाढ देण्यात आलीय.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पीएम किसान योजनेबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक झाली. महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विविध राज्यांचे कृषिमंत्री बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मंत्री सत्तार यांनी ई-केवायसीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सत्तार यांची मागणी मान्य करताना, मंत्री तोमर म्हणाले, पीएम किसान योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात येत आहे. योजनेच्या अटी -शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश योजनेत करुन 30 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करावी.

दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत मे-2022 मध्ये 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांचे लक्ष 12व्या हप्त्याकडे लागले असून, 5 सप्टेंबरपर्यंत हा हप्ता वर्ग केला जाणार असल्याची माहिती मिळाली..

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.