धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने राज ठाकरे दु:खी, पण…; कुणाला धरलं मनसेनं जबाबदार?

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी एखाद्या पक्षावर ही वेळ यावी ही मोठी दु:खद घटना आहे. याचे राजकीय भांडवल करणे हा माझ्या नेत्याचा स्वभाव नाही असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच यासाठी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.निष्पाप असल्याचा बुरखा पांघरतात. राजकारणात हे शपथा घेऊन चालत नाही.सल्लागार चुकीचा असल्यावर काय होऊ शकतं याचा उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे होय अशी टीका देखील मनसेकडून करण्यात आली आहे.
बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना पक्ष उभा केला होता पण उद्धव ठाकरे अहंकारात बुडाले होते. राजकारणात डावपेच सुरू असतात. आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ज्यांना जायचं त्यांनी जा, दरवाजे उघडे आहेत अशी भाषा वापरली.राज ठाकरे धनुष्यबाण गोठवल्याने दु:खीच असतील. राजकारण राजकारणासारखं असते. राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा कित्येक आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत येणार होते. परंतु कधीच कुणाला बोलावलं नाही. राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही असेही महाजन म्हणाले.निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला ती वेळ पक्षप्रमुखांमुळे आली असेही मनसेने म्हटले आहे.