BMC निवडणुकिसाठी काय आहे उद्धव ठाकरेंचा प्लॅन?

आगामी BMCच्या निवडणुकिसाठी शिवसेनेने जय्यत तयारी सुरु केलीय. आज शिवसेना भवनात झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत येत्या काळात नेमकं काय काय काम करायचं हा प्लॅन ठरलेला आहे.मुंबई महापालिकेवरील भगवा कायम ठेवण्याचा निर्धार करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१७ मधील निवडणुकिची आठवण करुन दिली.
शिवसेनेसाठी यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खरंच संघर्षमय असणार आहे. शिंदेनी केलेली बंडखोरी, शिवसेनेत पडलेली फूट, सुप्रीम कोर्टात सुरु असणारा खरी शिवसेना कोणाची हा वाद यामुळे यंदाचा अटीतटीचा सामना असणार यात शंकाच नाही. अवघ्या दोन महिन्यात महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे.भाजपनेसुद्धा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलारांच्या खांद्यावर देत एका अर्थाने प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं.
‘गेल्या निवडणुकीत आपण भाजपविरोधात लढलो आणि जिंकलो आहोत. यावेळीही आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे.आपल्या विभागातील कामे पूर्ण करा, वॉर्डमध्ये फिरा त्याचा आढावा घ्या. लोकांना संपर्क करा त्यांच्या समस्या जाणून घ्या. कोणात्याही आमिषाला बळी पडू नका’ असे मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केले. ‘वॉर्ड पुनर्ररचना झाल्याने आरक्षण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे असे सांगत २०१७ च्या वॉर्ड रचनेला आपला आक्षेप असून आपण याविरोधात कोर्टात जाणार असल्याचं देखील’ उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना भवनावर झालेल्या बैठकित पुन्हा एकदा ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला. तसेच बिहारमध्ये नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेच ठाकरेंनी कौतुक केलं. ‘विरोधी पक्षांच्या आधीच मित्रपक्षांना संपवणं हे भाजपचं धोरण आहे’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.